चंद्रपूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या त्रिसुत्रीतून तयार झालेला हा अंतरिम अर्थसंकल्प राज्याला विकासाच्या दिशेने नेणारा आहे, असे मत भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे यांनी व्यक्त केले आहे.
राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंगळवार दिनांक २७ फेब्रुवारीला राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजक, व्यापारी अशा सर्व घटकांना अर्थसंकल्पातून न्याय आणि विकासाची संधी देणारा हा अर्थसंकल्प दिसून येतो आहे. १ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी राज्य सरकारची वाटचाल स्तुत्य आहे.
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला, यावर प्रतिक्रिया देताना डॉ. अशोक जीवतोडे बोलत होते.
आठ लाख ५० हजार नवीन कृषीपंप बसवणार, एक लाख महिलांना रोजगार, ५००० पिंक रिक्षा, मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना, खेळाडूंसाठी 'मिशन लक्षवेध' योजनेअंतर्गत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भरीव तरतूद, निर्यात वाढीसाठी ५ इंडस्ट्रियल पार्क, 'मेक इन इंडिया' धोरणांतर्गत १९६ कोटी रुपयांची तरतूद, संजय गांधी निराधार योजनेत १००० वरुन १५०० रुपये पेन्शन, संत गाडगेबाबा महामंडळ स्थापना, प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत ३०० युनिटपर्यंत वीज बील माफ, ७ हजार ५०० किमीची रस्त्याची कामे हातात घेण्यात येणार आहेत, राज्यात १८ वस्त्रोद्योग उभारले जाणार, १ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी वाटचाल सुरु आहे, हर घर हर नल योजनेअंतर्गत १ कोटी नळ जोडणीचे उद्दिष्ट, राज्यात सहा वंदे भारत एक्स्प्रेस सुरु आहेत, मिहान प्रकल्पासाठी १० कोटींचा निधी दिला, नवी मुंबई विमानतळ वर्षभरात उभे राहणार, लघु उद्योग संकुलामधून रोजगार निर्मिती होणार, ३४ हजार घरकुल दिव्यांगासाठी बांधली जाणार, राज्यात ५० पर्यटन ठिकाणची निवड करण्यात आली आहे, अयोध्या आणि जम्मू काश्मीर या ठिकाणी महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय घेतला आहे, प्रत्येक तालुक्यात एक शववाहिका उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, शेतक-यांसाठी मागेल त्याला सौरपंप योजना सुरू केली जाणार, विदर्भात सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी २ हजार कोटी तरतूद, ४० टक्के अपारंपारिक उर्जा राबविणार, ३७ हजार आंगणवाडीना सौर उर्जा दिली जाणार, ४४ लाख नुकसान झालेल्या शेतक-यांना ३ हजार कोटी रुपयांची मदत देण्यात आली, १ लाख महिलांना रोजगार दिला जाईल, मिहान प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.
आदी सर्व मुद्दे राज्यातील सर्व क्षेत्रातील जनतेचे व संसाधनांचे उत्थान करणारे आहेत, असे डॉ. अशोक जीवतोडे म्हणाले.