भारतीय वार्ता (प्रतिनिधी): हॉटेलमध्ये जेवण करून घराकडे परत जात असताना पूर्ववैमनस्यातील वाद उफाळून आल्याने धारदार शस्त्राने दोघांचा खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी (ता. १२) रात्री दहा वाजता आर्णी मार्गावरील पल्लवी लॉनसमोर घडली. नवरात्रोत्सवात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाच्या घटनेने यवतमाळ जिल्हा हादरून गेला आहे.
जवळपास पाच वर्षांपूर्वी नवरात्रोत्सवात तिहेरी हत्याकांड घडले होते. यानिमित्त त्याही घटनेला उजाळा मिळाला. वसीम पठाण दिलावर पठाण (वय ३६, रा. नेताजीनगर) व उमेश तुळशीराम येरमे (३४, रा. नेताजीनगर) अशी मृतांची नावे आहेत. या गंभीर घटनेची दखल घेत अवधूतवाडी पोलिस ठाण्याच्या पथकाने अवघ्या सहा तासांत पाच जणांसह विधीसंघर्षग्रस्त बालकाला अटक केली. छोटू अनवर खा पठाण (५४, रा. नेताजीनगर), नीरज वाघमारे (३३ ,रा. मधुबन सोसायटी), अब्दुल रहेमान अब्दुल जब्बार शेख (२८, रा. नेताजीनगर), नितीन पवार (२४, रा. वडगाव),नीलेश उईके (२२, रा. लोहारा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहे.
मंगळवारी सायंकाळी सहा वाजता वसीम पठाण याच्या मोबाइलवर अब्दुल रहेमान याचा फोन आला. फोन स्पीकरवर असल्याने सदर फोन कुणाचा आहे, हे पत्नीला समजले. फोनवर वसीम ला बाहेर बसण्यासाठी बोलावले. लगेच मित्र उमेश येरमे व वसीम पठाण हे दोघेही बुलेटने निघून गेले. रात्री आठ वाजता उमेश व सनी बुलेट घेऊन परत आले. वसीम मित्रांसोबत बसून असल्याचे घरी सांगितले. रात्री साडेआठ वाजता पत्नीने वसीमला फोन केला. त्यावेळी आम्हाला नीरज वाघमारे याने पार्टी दिली आहे. मित्रांसोबत जेवण करून घरी येतो, असे सांगितले. रात्री दहा वाजता पत्नीने फोन केला, असता प्रतिसाद मिळाला नाही.
रात्री ११.३० वाजता दरम्यान सायरा बानो जाकीर शेख यांनी वसीम व उमेशचा खून झाल्याची माहिती पत्नीला दिली. छोटू अनवर खा पठाण, नीरज वाघमारे यांच्या सांगण्यावरून पतीचा खून केला, अशी तक्रार पत्नी निखत वसीम पठाण (वय २७, रा. नेताजीनगर) या महिलेने अवधूतवाडी पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला.अवघ्या सहा तासांत पोलिसांनी दोघांना नेताजीनगर व चार जणांना नांदगाव खंडेश्वर येथून अटक केली.
रात्री घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पुढील तपास ठाणेदार मनोज केदारे यांच्या
मार्गदर्शनात सुरू आहे.