यवतमाळ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित जाणता राजा महानाट्य तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन खासदार भावना गवळी यांनी महानाट्याच्या उद्घाटनावेळी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त यवतमाळ येथील समता मैदान (पोस्टल ग्राऊंड) येथे ‘जाणता राजा’ या तीन दिवसीय महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महानाट्याचे उद्घाटन खासदार भावना गवळी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, अधीक्षक अमोल पवार, तहसिलदार योगेश देशमुख, कंचन चौधरी, राजू पडगीलवार, शंतनू शेटे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
शिवाजी महाराजांचे ३५० वे राज्याभिषेक वर्ष राज्यभर विविध कार्यक्रमाने साजरे केले जात आहे. महाराजांचे जीवनकार्य, त्यांचे शौर्य, साहस, पराक्रम, विजयी परंपरा नवीन पिढीला माहिती व्हावी यासाठी राज्यभर जाणता राजा महानाट्याचे प्रयोग केले जात आहे. आज समता मैदान येथे महानाट्याच्या प्रयोगाला शाळा , महाविद्यालयातील विद्यार्थी व त्यांचे पालक, शिवप्रेमी, प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी, परिसरातील नागरिक परिवारासह उपस्थित होते.
दि.२९ ते ३१ जानेवारीपर्यंत सलग तीन दिवस सायंकाळी ६.३० ते रात्री ९.४५ यादरम्यान या महानाट्याचे प्रयोग होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करून स्वाभिमानाचा झेंडा संपूर्ण विश्वात फडकविणाऱ्या महारांजांची किर्ती ‘जाणता राजा’ या नाट्य प्रयोगातून दाखवण्यात येत आहे.
या महानाट्यात महाराजांच्या जन्मापासून मावळे जमवून बाल शिवाजींनी स्वराज्य स्थापनेची घेतलेली प्रतिज्ञा, अफजलखान वध आदिंसह शिवराज्याभिषेक सोहळ्याची आकर्षक आतषबाजीचे सादरीकरण करण्यात आले.
‘जाणता राजा’ महानाट्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार भावना गवळी यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांनी केले.